महावितरण रत्नागिरी परिमंडल कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा
रत्नागिरी l
महावितरणच्या रत्नागिरी परिमंडल कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महिलांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात समाजातील महिलांची भूमिका, त्यांचे सक्षमीकरण तसेच आर्थिक साक्षरतेचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास जेष्ठ समाजसेविका निलम पालव तसेच एचडीएफसी बँकेच्या असिस्टंट मॅनेजर निखिता सावंत या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
या प्रसंगी मंचावर महावितरण रत्नागिरी परिमंडलाचे अधीक्षक अभियंता सुनिलकुमार माने, सहाय्यक महाव्यवस्थापक अजय निकम, कार्यकारी अभियंते अभिजीत सिकनिस, जितेंद्र फुलपगारे, अनुराधा आंधनसरे, औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे तसेच कार्यालयातील महिला अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमात बोलताना जेष्ठ समाजसेविकानिलम पालव म्हणाल्या.
आजच्या आधुनिक काळात महिलांनी केवळ घरापुरती मर्यादा न ठेवता शिक्षण, नोकरी, उद्योग, राजकारण, सामाजिक कार्य अशा अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. घर आणि करिअर यांचा समतोल साधत त्या कुटुंबाला अधिक सक्षम बनवत आहेत. महिलांनी स्वतःचे स्पष्ट ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. महिलांनी अधिकारांची व संबंधित विविध कायद्यांची माहिती करून घ्यावी. त्याचबरोबर मानसिक व वैयक्तिक विकासासाठी छंद जोपासावेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
एचडीएफसी बँकेच्या असिस्टंट मॅनेजर निखिता सावंत यांनी महिलांना आर्थिक साक्षरतेबाबत मार्गदर्शन करताना बचत आणि गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांनी आपल्या उत्पन्नाचे योग्य नियोजन करून भविष्यासाठी बचत आणि गुंतवणूक केली पाहिजे. घरातील स्त्री अर्थसाक्षर झाल्यास त्या घराची आर्थिक प्रगती अधिक वेगाने होते, असे त्या म्हणाल्या. त्यांनी विविध गुंतवणूक पर्यायांची माहिती देत आर्थिक शिस्त आणि नियोजनाचे महत्त्वही स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात अधीक्षक अभियंता सुनिलकुमार माने यांनी महावितरणमध्ये महिला कर्मचारी अत्यंत जबाबदारीने आपली कर्तव्ये पार पाडत असून संस्थेच्या प्रगतीत मोलाचे योगदान देत आहेत असे नमूद केले. प्रास्ताविक दर्शना साजणे यांनी तर स्वागत व सूत्रसंचालन तृप्ती जोशी यांनी केले. व्यवस्थापक (मानव संसाधन) श्रावणी कांबळे यांनी आभार मानले.


