माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे निर्णय
राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक बैठक संपन्न
जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली माजी सैनिकांचे पुनर्वसन व पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी (महाराष्ट्र) समितीची ५० वी वार्षिक बैठक लोकभवन, मुंबई येथे पार पडली.
या बैठकीत पंढरपूर येथे वारी आणि दर्शनासाठी येणाऱ्या माजी सैनिकांच्या सोयीसाठी तसेच सातारा येथे एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याबाबत व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करण्यास राज्यपालांनी मान्यता दिली.
बैठकीस शंभूराज देसाई, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव संतोष कुमार, लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाह, रिअर ॲडमिरल शंतनू झा, एअर व्हाइस मार्शल प्रशांत वडोदकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सैनिक कल्याण संचालक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्त्वपूर्ण प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली. राज्यातील माजी सैनिकांच्या सुविधा, पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.


