रत्नागिरी विभागाला ‘राजमाता जिजाऊ’च्या १०० अत्याधुनिक बसेस
प्रवास होणार अधिक सुरक्षित व आरामदायी
रत्नागिरी : राज्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून राज्य परिवहन महामंडळाने अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत रत्नागिरी विभागाला तब्बल १०० नवीन बसेस मिळणार असून त्या टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील ९ आगारांमध्ये दाखल होणार आहेत.
मुंबई येथे नुकतेच या नव्या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण ३ हजार ‘राजमाता जिजाऊ’ बसेस समाविष्ट होणार आहेत. या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, ३ बाय २ आसन क्षमता यांसारख्या अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायी होणार आहे.
यापूर्वी एसटी महामंडळाने शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा ऐतिहासिक नावांनी बससेवा सुरू करून वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेच्या माध्यमातून एसटी सेवेत नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचे मानले जात आहे.
जिल्ह्यांतर्गत प्रवास करताना जागेअभावी अनेक प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन ३ बाय २ आसन क्षमतेच्या बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे अधिक प्रवाशांना बसण्याची सुविधा मिळणार आहे.
या योजनेची सुरुवात नागपूर येथून करण्यात येणार असून प्रारंभी तेथे ५० बसेस दाखल होतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर जिल्ह्यांना बसेस देण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात या बसेस लवकरच दाखल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


