लोकमत समूहाचा ‘सरपंच पुरस्कार’ सोहळा उत्साहात
ग्रामीण विकासात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरपंचांचा गौरव
मुंबई, दि. ३ : लोकमत समूहाच्या वतीने आयोजित ‘सरपंच पुरस्कार’ सोहळा उत्साहात पार पडला. ग्रामीण विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यभरातील सरपंचांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण नेतृत्वाच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंचांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी लोकमत समूहाचे संस्थापक, स्वातंत्र्यसैनिक तथा ज्येष्ठ पत्रकार स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या लोकशाही मूल्यांवरील विचारांचा तसेच महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी बळकट केलेल्या पंचायत राज व्यवस्थेचा गौरव केला. ग्रामविकासात सरपंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, गावाच्या प्रगतीचे नेतृत्व त्यांच्या हातात असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी काटेवाडीच्या ग्रामविकासाचा अनुभवही उपस्थितांसमोर मांडण्यात आला. संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानापासून सुरू झालेल्या विकासप्रवासात ग्रामस्वच्छता, कचरामुक्त व हागणदारीमुक्त गाव, जलसंधारण, वृक्षारोपण, सौरऊर्जा, ठिबक सिंचन, आधुनिक शेती, सायबर ग्राम, इको व्हिलेज तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे काटेवाडीची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.



