वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव कुबल यांचे निधन
वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव कुबल यांचे निधन
राजकीय, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील नेतृत्व हरपले
वेंगुर्ला, दि. २४ : वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव कुबल यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वेंगुर्ला शहरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून, राजकीय, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील एक अनुभवी नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
शिवाजीराव कुबल यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात तळमळीने कार्य करत जनसामान्यांशी कायम जिव्हाळ्याचे नाते जपले. कोकणाच्या मातीशी निष्ठा राखत त्यांनी विकासाभिमुख कामांना प्राधान्य दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणूनही त्यांची राज्यभर ओळख होती.
राजकारणाबरोबरच ते एक आदर्श आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांचे मार्गदर्शक म्हणूनही प्रसिद्ध होते. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना “कृषीभूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शेतकऱ्याच्या मुलापासून लोकप्रतिनिधीपर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास अनेकांसाठी आदर्श ठरला.
त्यांच्या निधनामुळे वेंगुर्ला आणि सिंधुदुर्गने लोकांमध्ये मिसळणारा, संवेदनशील आणि जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी तत्पर असलेला नेता गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
शिवाजीराव कुबल हे प्राचार्य मुकुंदराव कदम यांचे ते जिवलग मित्र होते तसेच ‘दैनिक सिंधुदुर्ग समाचार’चे हितचिंतक होते. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग समाचार परिवारानेही एक स्नेही, मार्गदर्शक आणि शुभचिंतक गमावला आहे.
ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.