सिंधुदुर्गातील आरोग्यव्यवस्थेचा आक्रोश!
“वाचवा… माझा बाबा गोव्याला जाताना वाटेतच गेला!”
सुसज्ज रुग्णालयाअभावी प्रत्येक गंभीर रुग्णाला परराज्याची वाट ; जिल्हा रुग्णालय ‘रेफर सेंटर’ बनल्याचा संतप्त सवाल
विशेष प्रतिनिधी
“डॉक्टर, काहीतरी करा… माझा नवरा वाचवा.” हा आक्रोश आंबोली घाटातल्या त्या ॲम्ब्युलन्समधून बाहेर पडतो, पण तो ऐकायला सिंधुदुर्गात एकही सुसज्ज अतिदक्षता विभाग नाही. नाडी मंदावते, श्वास जड होतो आणि गाडी गोव्याच्या दिशेने सुसाट धावते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच असते. कोल्हापूरच्या पुढे जायच्या आतच त्या माऊलीच्या कपाळाचं कुंकू पुसलं जातं. कारण सिंधुदुर्गात त्याला वाचवणारं एक हॉस्पिटल नव्हतं!
हा आक्रोश केवळ एका कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेदनेचा आवाज बनला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयासह अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक उपचार सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर आणि जीवनरक्षक यंत्रणा उपलब्ध
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयासह अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक उपचार सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर आणि जीवनरक्षक यंत्रणा उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था ही उपचारापेक्षा “रेफर” करण्यापुरतीच मर्यादित राहिल्याचा आरोप होत आहे.
गंभीर जखमी रुग्ण असो, हृदयविकाराचा रुग्ण असो किंवा मेंदूतील रक्तस्रावाचा रुग्ण असो, डॉक्टरांकडून अनेकदा “गोव्याला घेऊन जा, कोल्हापूरला रेफर करा किंवा मुंबईला हलवा,” असे सांगितले जाते. मात्र पावसाळ्यातील लांबचा प्रवास, वाहतुकीची कोंडी आणि वेळेचा विलंब यामुळे अनेक रुग्ण वाटेतच मृत्यूला सामोरे जात असल्याची हृदयद्रावक उदाहरणे समोर येत आहेत.
प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांनाही अनेकदा तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे बाहेरील रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. अपघातग्रस्त रुग्णांसाठी न्यूरोसर्जन, हृदयविकाराच्या रुग्णांसाठी कार्डिओलॉजिस्ट, अत्याधुनिक सीटी स्कॅन, एमआरआय आणि प्रगत अतिदक्षता विभाग यांसारख्या सुविधा जिल्ह्यात सर्वत्र उपलब्ध नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
गोवा किंवा कोल्हापूर येथे उपचारासाठी जाणे म्हणजे केवळ प्रवास नसून अनेक कुटुंबांसाठी ती आर्थिक आणि भावनिक लढाई ठरते. उपचारासाठी कर्ज काढणे, दागिने गहाण ठेवणे किंवा जमीन विकण्याची वेळ अनेकांवर येते. काही जण आपल्या माणसाला वाचवून परततात, तर अनेकांच्या वाट्याला घरी परतताना फक्त दुःख आणि कर्ज उरते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्याला अनेक लोकप्रतिनिधी, मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी दिले. पर्यटन, उद्योग आणि विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत असताना, जिल्ह्यातील नागरिकांना आजही विश्वासाने उपचार घेता येईल असे सर्व सुविधांनी सुसज्ज रुग्णालय मिळू नये, हा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.
आज प्रत्येक सिंधुदुर्गवासीयाच्या मनात एकच प्रश्न आहे—“उद्या माझ्या कुटुंबातील व्यक्तीला काही झाले, तर तिला वेळेत उपचार कुठे मिळणार?” या प्रश्नाचे ठोस उत्तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी देणार का, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
नागरिकांची प्रमुख मागणी
-
जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक ट्रॉमा सेंटर सुरू करावे.
-
२४ तास कार्यरत कार्डिओलॉजी, न्यूरोसर्जरी व न्यूरोलॉजी विभाग उपलब्ध करावेत.
-
एमआरआय, सीटी स्कॅन व कॅथलॅबसह सर्व आधुनिक सुविधा तातडीने सुरू कराव्यात.
-
तज्ज्ञ डॉक्टरांची कायमस्वरूपी नियुक्ती करून रेफरचे प्रमाण कमी करावे.
-
सिंधुदुर्गवासीयांना जिल्ह्यातच दर्जेदार आणि तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी.


