पर्यटन क्षेत्रात स्वतःची शैली निर्माण करून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
346

कोरोना काळातही महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेले काम प्रशंसनीय आहे. येणाऱ्या काळात राज्यात येणारा प्रत्येक पर्यटक आपला ब्रँड ॲम्बेसेडर झाला पाहिजे, इतक्या चांगल्या दर्जाचे पर्यटन महाराष्ट्रात विकसित व्हावे असे सांगताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटनाला असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये घेण्यात येईल असे जाहीर केले. राज्यातील पर्यटनाचे वैभव जपा, जोपासा, वाढवा आणि हे करीत असतानाच पर्यटन क्षेत्रात स्वतःची शैली निर्माण करून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करा, असे मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी सांगितले.

कोविडनंतर पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठीचे धोरण आणि नियोजन केले. अनेकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. या निमित्ताने आजवर दुर्लक्षित असलेल्या विभागाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आपण आपले वैभव जगासमोर आणत आहोत, हे करीत असताना नवीन पर्यटन स्थळेही विकसित करण्याची सूचना त्यांनी केली. सध्या सुरू असलेल्या कामाच्या माध्यमातून ‘महा’राष्ट्र खऱ्या अर्थाने जगासमोर येईल, असा विश्वास व्यक्त करून सरकार कायम चांगल्या योजनांच्या पाठिशी राहील, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र पर्यटनाच्या सुधारित संकेतस्थळाचे व महाराष्ट्र टुरिझम या मोबाईल ॲपचे सुद्धा उदघाटन करण्यात आले. या संकेतस्थळाच्या सुधारित आवृत्तीत मराठी भाषेसह एकूण ९ विविध भाषांमध्ये पर्यटकांना माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील तब्बल ३५० पर्यटनस्थळांची थीम नुसार वर्गीकृत करून माहिती देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सर्वांगीण विकासासाठी पर्यटन’ हे घोषवाक्य सर्वार्थाने सार्थ ठरवणारी वाटचाल सुरू असल्याबद्दल पर्यटन विभागाचे कौतुक केले. राज्यात गड किल्ले, किनारपट्टी, साहसी पर्यटन, धार्मिक स्थळे, शैक्षणिक आणि वैद्यकीय पर्यटन अशा पर्यटनाच्या विविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. त्यांचा योग्य वापर करून पर्यटकांना आकर्षित करताना पर्यटन स्थळांवर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होत असलेल्या चिपी विमानतळाचा कोकणातील पर्यटनाला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील पर्यटकांनी आधी महाराष्ट्र फिरावा, त्यानंतर इतरत्र जावे, असे आवाहनही त्यांनी केले. पर्यटन विभागाला गरजेनुसार निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते IITF (Incredible India Tourism Facilitator) अभ्यासक्रमांतर्गत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांना तसेच फोटोग्राफी स्पर्धेतील व महाराष्ट्राचा मास्टरशेफ स्पर्धेतील विजेत्यांपैकी प्रत्येकी दोन विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर पर्यटन संचालनालयाचे सह संचालक डॉ. धनंजय सावळकर व पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह यांनी मागील काळात आखलेल्या नवनवीन योजना व त्यांच्या अंमलबजावणीसाठी तसेच पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध विकासकार्यांसाठी केलेल्या कामाचे विशेष कौतुक करत त्यांचाही सत्कार करण्यात आला.

प्रारंभी पर्यटन संचालनालयाद्वारे ऑगस्ट महिन्यात जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त समाज माध्यमाद्वारे  आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र थ्रू माय लेन्स’  या फोटोग्राफी स्पर्धेतील स्पर्धकांच्या विजेत्या फोटो  प्रदर्शनास मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केले. पर्यटन संचालक श्री.बोरीकर यांनी प्रास्ताविकाद्वारे पर्यटन संचालनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर सह संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी आभार मानले.

भारतातच नव्हे तर जगभरात पर्यटनाच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक मूल्यांचा विकास होत आहे. या संदर्भात जागृती निर्माण करत पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी दरवर्षी २७ सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेतर्फे (UNWTO) ‘पर्यटनातून सर्वांगीण विकास’ हे घोषवाक्य जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाद्वारे आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिह, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन संचालक मिलींद बोरीकर आदी उपस्थित होते. पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here