असुर्डे येथे विना परवाना खैर लाकूड जप्त, वन विभागाची कारवाई
रत्नागिरी
असुर्डे महामार्गावर विनापास खैर लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर वन विभागाने कारवाई केली. वनपाल अधिकारी रेशमा कावळे व जाधव यांच्या टीमने सकाळी सुमारे ९.३० वाजता झेनॉन वाहनातून होत असलेली बेकायदेशीर खैर वाहतूक पकडली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही गाडी ताब्यात घेऊन ती असुर्डे येथील पटेल मिल परिसरात जमा केली. वाहनाची चावी जप्त करून संबंधित महिला कर्मचारी घटनास्थळावरून निघून गेल्या. सदर वाहन मिल परिसरात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. तन्मय मंगेश सुर्वे (साखरपा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे ८० मण खैर लाकूड दहीवली येथील कात भट्टीवर घेऊन जाण्यात येत होते. लाकूड काढण्याचा तसेच वाहतुकीचा परवाना नसल्याची माहितीही त्यांनी दिली. वन विभागाच्या या तात्काळ कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर लाकूड व्यवसायावर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.


