उरणमध्ये ‘बोगस मतदानाचा’ आरोप
आमदार महेश बालदी यांच्या वक्तव्यावरून वाद वाढला
उरण | प्रतिनिधी
उरण विधानसभा क्षेत्रात आज मतदानाच्या पार्श्वभूमीवर बोगस मतदानाचे गंभीर आरोप करण्यात येत असून राजकीय वातावरण तापले आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार महेश बालदी यांनी “ठोकून अनाधिकृत मतदान करा” असे वक्तव्य केल्याचा दावा विरोधकांनी केला होता. त्याच वक्तव्याच्या छायेत आज प्रत्यक्षात अनधिकृत मतदान होत असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
हे पण वाचा समृद्धी महामार्गावरून एसी इलेक्ट्रिक बससेवा सुरू
विरोधकांच्या म्हणण्यानुसार, पुणे व मुंबईमधून खास मतदानासाठी उरणमध्ये आलेल्या मतदारांचे मतदान आधीच झालेले आढळले, ज्यामुळे संताप व्यक्त होत आहे. “ही कोणती लोकशाही आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याप्रकरणी विरोधी गटाने सत्ताधारी गटावर सरळसरळ निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला असून, “उरणमध्ये पारदर्शक मतदान होऊ द्या. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष पार पाडू द्या; अन्यथा आग्री-कोळी समाजाची ताकद काय आहे ते दाखवू,” असा इशारा त्यांनी दिला आहे.या घडामोडींमुळे उरणमधील निवडणूक अधिकच गाजत असून, प्रशासनाकडून याबाबत काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


