नवी मुंबई पोलिसांकडून नागरिकांना दिलासा : ₹३३ लाखांहून अधिक किमतीचा जप्त मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनंतर परत
नवी मुंबई पोलिस नागरिकांचा विश्वास दृढ करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस उप आयुक्त, परिमंडळ–२, बेलापूर यांच्या संकल्पनेतून सीबीडी व पोर्ट विभागांतर्गत दाखल मालमत्तेच्या गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ फिर्यादी व साक्षीदारांना परत करण्यात आला.
सीबीडी व पोर्ट विभागातील नेरुळ, एन.आर.आय. सागरी, सीबीडी, उलवे, न्हावा शेवा, उरण व मोरा सागरी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपींकडून जप्त करण्यात आलेला एकूण ₹३३,१३,२९९/- किमतीचा मुद्देमाल परत देण्यासाठी दि. १५/१२/२०२५ रोजी एन.आर.आय. सागरी पोलीस ठाणे येथे विशेष मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मोबाईल फोन, सोन्याचे दागिने, चांदीची भांडी तसेच दुचाकी वाहने असा विविध प्रकारचा मुद्देमाल संबंधित लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आला. दीर्घ काळानंतर हरवलेला किंवा चोरीस गेलेला माल परत मिळाल्याने नागरिकांनी नवी मुंबई पोलिसांचे आभार मानले.
नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण, गुन्ह्यांचा तपास आणि कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून न्याय देण्याची भूमिका नवी मुंबई पोलिस सातत्याने बजावत असून, अशा उपक्रमांमुळे पोलीस व नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र आहे.
नवी मुंबई पोलीस हेल्पलाइन : ८८ २८ ११२ ११२


