कोकण रेल्वे मार्गावरील ‘कोकणकन्या’, ‘तुतारी’सह महत्त्वाच्या गाड्यांच्या तत्काळ तिकिटांसाठी आधार OTP अनिवार्य
कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असून, रेल्वे प्रशासनाने तिकीट आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि दलालगिरी व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. २३ डिसेंबर २०२५ पासून देशभरातील निवडक १०० गाड्यांच्या तत्काळ (Tatkal) आणि प्रीमियम तत्काळ तिकिटांसाठी आधार OTP पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. या यादीत कोकण रेल्वे मार्गावरील काही अत्यंत महत्त्वाच्या आणि लोकप्रिय गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या पत्रानुसार, कोकण मार्गावरून धावणाऱ्या खालील गाड्यांसाठी तत्काळ तिकीट काढताना आता आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर येणारा OTP टाकणे आवश्यक असणार आहे.
यामध्ये कोकण कन्या एक्सप्रेस (२०१११) या मुंबई ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या लोकप्रिय गाडीचा समावेश आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची ही प्रमुख पसंतीची गाडी असल्याने या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे तुतारी एक्सप्रेस (११००३) ही दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणारी गाडी देखील आधार OTP प्रणालीच्या कक्षेत आली आहे. कोकणवासीयांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या गाडीच्या तत्काळ तिकिटांसाठी आता OTP पडताळणी बंधनकारक राहणार आहे.
याशिवाय, कोकण रेल्वे मार्गावरून जाणारी लांब पल्ल्याची मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस (१२६१८) — हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम दरम्यान धावणारी गाडीही या नव्या नियमांतर्गत समाविष्ट करण्यात आली आहे. या गाडीने उत्तर भारतातून कोकण व केरळकडे जाणाऱ्या प्रवाशांना देखील नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, ज्यांना या गाड्यांचे तत्काळ किंवा प्रीमियम तत्काळ तिकीट आरक्षित करायचे आहे, त्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करून घ्यावी. अन्यथा तिकीट आरक्षणाच्या वेळी OTP न मिळाल्याने अडचणी निर्माण होऊ शकतात.
या निर्णयामुळे दलालांकडून मोठ्या प्रमाणात होणारी तत्काळ तिकिटांची बेकायदेशीर बुकिंग थांबेल, तसेच खऱ्या गरजू प्रवाशांना तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. कोकण मार्गावरील प्रवाशांनी या नव्या नियमाची दखल घेऊन आगाऊ तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


