मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंचा संयुक्त जाहीरनामा
घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये स्वाभिमान निधीची घोषणा
मुंबई l प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंचा जाहीरनामा मुंबईकरांसाठी अनेक मोठी आश्वासने देणारा ठरला आहे. घरकाम करणाऱ्या महिलांना दर महिन्याला १५०० रुपये स्वाभिमान निधी दिला जाईल, त्यासाठी महिलांची नोंदणी करून निधी देण्याची सोय केली जाईल. नागरिकांना १० रुपयात जेवण आणि नाश्ता मिळेल, तसेच नोकरदार, पालक आणि कष्टकरी महिलांसाठी पाळणाघरे सुरु केली जातील. पाळीव प्राण्यांसाठी विशेष दवाखाना उभारला जाईल, तर बाळासाहेब ठाकरे स्वयं रोजगार अर्थसाह्य योजना राबवण्यात येईल.
महापालिकेतील अत्यावश्यक रिक्त पदे भरण्यात येतील, प्रत्येक वार्डात आजी-आजोबा मैदान उभारले जातील आणि ७०० चौ. फूटापर्यंतच्या मालमत्तेवरील कर माफ केले जातील. कचरा कर रद्द केला जाईल आणि महापालिकेच्या शाळा बिल्डरच्या हातात जाणार नाही याची हमी मिळेल. दहावीनंतर महापालिका शाळेत बारावीपर्यंत ज्युनियर कॉलेज सुरु केला जाईल, तसेच मुंबई पब्लिक स्कूलचा दर्जा अत्याधुनिक केला जाईल.
मुंबईकरांना पाणी पुरवठा दर स्थिर ठेवून उपलब्ध करून दिला जाईल, फुटपाथ आणि मोकळ्या जागा सुरक्षित करण्यात येतील, तसेच खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास उपलब्ध करून देण्यात येईल. महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास असेल, महापालिकेच्या पार्किंगमध्ये मोफत पार्किंगची सोय होईल आणि प्रत्येक वार्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले जातील. समुद्राचे पाणी गोड्या पाण्यात रूपांतर करून वापरण्यायोग्य केले जाईल, नालेसफाईसाठी १२ महिन्यांची प्रक्रिया राबवली जाईल आणि शाळांमध्ये हसत-खेळत मराठी शिकवणारा डिजीटल उपक्रम सुरु केला जाईल.
यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सर्वात मोठे ग्रंथालय तयार केले जाईल, मुंबईत सुपर स्पेशालिस्ट कॅन्सर रुग्णालय उभारले जाईल आणि रॅपिड बाईक मेडिकल असिस्टंट ऍम्ब्युलन्स सेवा सुरु केली जाईल. उत्कृष्ट दर्जाचे रस्ते तयार करण्यात येतील, कंत्राटदाराकडून १५ वर्षांची हमी घेतली जाईल, तसेच सांडपाणी प्रक्रिया करणारे मल निसारण प्रकल्प उभारले जातील. या सर्व उपाययोजनांमुळे मुंबईकरांना सुरक्षित, सोयीस्कर आणि परवडणाऱ्या सेवांचा लाभ मिळेल, असे ठाकरे बंधूंनी आश्वासन दिले आहे.


