एकाचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठे आव्हान – राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याची प्रक्रिया ही राज्यातील गेल्या ३० वर्षांतील पहिलीच वेळ असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले. अवघ्या तीन ते चार महिन्यांच्या अल्प कालावधीत या निवडणुका पार पाडणे हे राज्य निवडणूक आयोगासाठी मोठे आव्हान होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मतदान यंत्रांची उपलब्धता, कर्मचाऱ्यांची कमतरता, मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नोंदी तसेच आठ-नऊ वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकांमुळे राजकीय पक्षांमध्ये निर्माण झालेली तीव्र स्पर्धा, या सर्व बाबींचा दबाव आयोगावर होता. याच कारणांमुळे राज्य निवडणूक आयोगाला लक्ष्य केले जात असल्याचे मत वाघमारे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले.


