कणकवली शहरात धोकादायक विद्युत तारांची जागा घेणार एबीसी केबल !
२ किलोमीटर भागातील काम प्राधान्यक्रमाने सुरू
कणकवली l प्रतिनिधी
कणकवली शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी इमारतींना चिकटून जाणाऱ्या धोकादायक विद्युत तारांना काढून एरियल बंच कंडक्टर (एबीसी) केबल बसविण्याचे काम प्राधान्यक्रमाने सुरू करण्यात आले आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा काम आरडीएसएस योजनेअंतर्गत एलटी लाईनवर होत असून, आतापर्यंत कणकवली पटवर्धन चौक ते बाजारपेठेतील १० पोलांवर तार काढून नवीन केबल बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.
कणकवली शहरातील लोकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आरडीएसएस योजनेअंतर्गत, धोकादायक स्थितीत असलेल्या एलटी पोलवरील तार बदलून एबीसी केबल बसविण्याचे काम मंजूर झाले आहे. कणकवली शहरातील प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी, इमारतींना व गॅलरीला चिकटलेल्या तारांना काढून नवीन केबल बसविण्यात येत आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही ठिकाणी मोठी झाडे आणि त्यांना चिकटलेल्या तारांचेही बदल करण्याचे काम लवकरच हाती घेतले जाईल. कणकवली येथील कापड व्यापारी माधव शिरसाट यांनी या समस्येकडे लक्ष वेधले होते, आणि काही दिवसातच महावितरणने काम मार्गी लावल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.


