१४ मार्च रोजी रत्नागिरीत राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या वतीने शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीच्या माध्यमातून विविध प्रलंबित वाद सामोपचाराने आणि जलद पद्धतीने निकाली काढण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीत मोटार अपघात दावा प्रकरणे, बँक कर्ज वसुली प्रकरणे, धनादेश अनादर प्रकरणे, कौटुंबिक वाद, वीज-पाणी बिलांशी संबंधित वाद, तसेच न्यायालयात प्रलंबित व न्यायपूर्व प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा केला जातो. लोकअदालतीत प्रकरण निकाली निघाल्यासदोन्ही पक्षांचा वेळ, पैसा व श्रम वाचतात, तसेच अंतिम निर्णयामुळे पुढील अपीलची आवश्यकता राहत नाही.
या लोकअदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा व आपले वाद तडजोडीने, शांततापूर्ण मार्गाने मिटवावेत, असे आवाहन अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा. विनोद यशवंतराव जाधव यांनी केले आहे. लोकअदालतीत सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी संबंधित न्यायालयात किंवा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.


