रत्नागिरीत कासव महोत्सवातून ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ३० किनारपट्ट्यांवर कासव संवर्धनाचे कार्य सुरू असून, विशेषतः ऑलिव्ह रिडले टर्टलच्या संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या कासवांच्या संवर्धन व संरक्षणासाठी वनविभाग व कांदळवन विभागाच्या संयुक्त पुढाकारातून दरवर्षी कासव महोत्सव आयोजित करण्यात येतो. या उपक्रमाच्या माध्यमातून कासवांचे अंडी संरक्षण, नैसर्गिक अधिवास जतन तसेच जनजागृतीवर भर दिला जात आहे.कासव महोत्सवाच्या काळात पर्यटकांना कासवांचे जीवनचक्र, त्यांचे समुद्रातील महत्त्व आणि पर्यावरणीय समतोल राखण्यात त्यांची भूमिका याची माहिती देण्यात येते. या महोत्सवामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकां मध्ये सकारात्मक जागरूकता निर्माण होत आहे.
वनविभाग व कांदळवन कक्षामार्फत सर्व पर्यटकांना आवाहन करण्यात आले आहे की, कासव महोत्सवाचा आनंद घेताना विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. किनाऱ्यावर प्रकाश, आवाज, कचरा अथवा कासवांच्या मार्गात अडथळा निर्माण होईल अशी कोणतीही कृती टाळावी, जेणेकरून या दुर्मिळ समुद्री जीवांचे संरक्षण प्रभावीपणे करता येईल.


