महापौर रितू तावडे यांनी जाहीर केला मास्टर प्लान !
मुंबईच्या महापौर पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी रितू तावडे यांनी पुन्हा एकदा बांगलादेशीच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. महापौर म्हणून पहिलं कोणतं काम करणार याचा मास्टर प्लानच रितू तावडे यांनी आज जाहीर केला.
महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना हा बहुमान मिळवून देण्यासाठी देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला आहे, याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहे. मुंबई अध्यक्ष अमित साटम त्यांनीही माझे नाव सुचवले होते. त्यामुळे भाजपची पंरपरा आहे की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पुढे आणलं जातं. घराणेशाहीला नाही, हे या निवडीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, असे रितू तावडे म्हणाल्या.
“मी महापौर म्हणून नाही तर सेवक म्हणून काम करणार आहे. माझ्या पहिल्या दिवसापासून मी सांगते की जरी मी महापौर झाले तरी मुंबईची सेवा करणार आहे.” पदभार स्वीकारल्यानंतर, मुंबईतील बेकायदेशीर बांगलादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करणे हेच माझे प्राधान्य असेल, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेत आज ११ फेब्रुवारी रोजी महापौरपदाची औपचारिक घोषणा केली जाणरा आहे. तब्बल ४४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भाजपचा दुसरा महापौर मुंबईच्या महापौरपदी विराजमान होत आहे. भाजपच्या रितू तावडे यांची महापौरपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. तर शिवसेना शिंदे गट गटाचे संजय घाडी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. विरोधी पक्षाकडून कोणताही अर्ज दाखल न झाल्याने त्यांच्या महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे मुंबई महापालिकेवरील प्रशासकीय राजवट अखेर संपुष्टात येणार आहे.

