भारतीय कंपन्यांच्या ट्रक खरेदीवर इंडोनेशियाची तात्पुरती स्थगिती
जकार्ता : इंडोनेशिया सरकारने भारतातील वाहन उत्पादक कंपन्यांकडून घेण्यात येणाऱ्या सुमारे १ लाख ५ हजार ट्रकांच्या मोठ्या खरेदी आदेशाला तात्पुरती स्थगिती दिल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवहाराची एकूण किंमत सुमारे १.५ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी असल्याचे सांगितले जात आहे.
या ऑर्डरमध्ये महिंद्रा कंपनीकडून ३५ हजार स्कॉर्पिओ पिक-अप वाहने घेण्याचे नियोजन होते, तर टाटा कंपनीकडून ३५ हजार योधा चार बाय चार आणि ३५ हजार अल्ट्रा टी.७ ट्रक घेण्याचा प्रस्ताव होता. ही वाहने प्राबोवो सरकारच्या ग्रामीण सहकारी संस्थांच्या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार होती.
मात्र, इंडोनेशियातील स्थानिक वाहन उत्पादक कंपन्यांनी या व्यवहाराला तीव्र विरोध दर्शविला आहे. टोयोटा, इसुझू आदी स्थानिक कंपन्यांनी ही वाहने देशांतर्गत उत्पादनातून पुरवता येऊ शकतात आणि त्यामुळे स्थानिक रोजगारही टिकून राहतील, असा दावा सरकारकडे केला आहे.
या पार्श्वभूमीवर इंडोनेशिया सरकारने या खरेदी प्रक्रियेला तात्पुरता विलंब देण्याचा निर्णय घेतला असून सध्या या विषयावर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या करारांतर्गत काही वाहने आधीच इंडोनेशियात पोहोचली असल्याची माहितीही समोर आली आहे.
हा व्यवहार अद्याप पूर्णपणे रद्द करण्यात आलेला नसला तरी स्थानिक उद्योगांकडून वाढत असलेल्या दबावामुळे या प्रकरणातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.


