
कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात खासगी रुग्णालये व सेवाभावी संस्थांचा सहभाग महत्त्वाचा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई : कर्करोगाविरुद्धच्या लढाईत शासकीय यंत्रणेबरोबरच खासगी कर्करोग रुग्णालये, कर्करोग तज्ज्ञ आणि सेवाभावी संस्थांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. आरोग्यसेवा आयुक्तालय, मुंबई येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस वरिष्ठ मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, ऑन्कोसर्जन, तज्ज्ञ प्राध्यापक, कर्करोग उपचार क्षेत्रात कार्यरत टाटा, रिलायन्स, लिलावती तसेच इतर खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी, शासकीय व खासगी रुग्णालयांतील कर्करोग तज्ज्ञ, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी आणि दक्षिण कोरियातील आयएमबी संस्थेचे तज्ज्ञ दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, राज्यात कर्करुग्णांची संख्या वाढत असून कर्करोग उपचारांमध्ये अर्ली डिटेक्शन (लवकर निदान) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे जनजागृती, निदान आणि उपचार या त्रिसूत्रीच्या आधारे राज्य शासन कर्करोगाविरोधात व्यापक मोहीम राबवत आहे.
कर्करोग तपासणीसाठी राज्यातील आठही परिमंडळांमध्ये विशेष कर्करोग निदान व्हॅन कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत तीन कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच कर्करुग्णांना स्थानिक पातळीवर उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यात २७ ठिकाणी डे-केअर कॅन्सर युनिट्स सुरू करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, शहरी आरोग्य आयुक्त सुनील भोकरे तसेच उपसचिव विलास बेंद्रे उपस्थित होते.
महत्त्वाचे मुद्दे
-
कर्करोगाविरोधातील लढाईत खासगी क्षेत्राचा सहभाग महत्त्वाचा.
-
अर्ली डिटेक्शनमुळे रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते.
-
राज्यातील ८ परिमंडळांमध्ये कर्करोग निदान व्हॅन कार्यरत.
-
आतापर्यंत ३ कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी.
-
राज्यात २७ ठिकाणी डे-केअर कॅन्सर युनिट्स सुरू होणार.

