रत्नागिरी — कोकण रेल्वे महामंडळ लिमिटेड (केआरसीएल) तर्फे ३ जून २०२६ रोजी रत्नागिरी येथे मालवाहतूक क्षेत्रातील ग्राहक आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांसाठी विशेष व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात कोकण रेल्वेच्या संपूर्ण नेटवर्कवर करण्यात आलेल्या मालवाहतूक पायाभूत सुविधांच्या सुधारणांचे सादरीकरण करण्यात आले.
या मेळाव्याचे अध्यक्षस्थान केआरसीएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (CMD) संतोष कुमार झा यांनी भूषविले. यावेळी केआरसीएलचे वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात मालवाहतुकीसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या नव्या सुविधा, पायाभूत सुविधांमधील सुधारणा, लॉजिस्टिक सेवा, माल हाताळणी क्षमता वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच भविष्यातील विकास आराखड्याची माहिती ग्राहकांना देण्यात आली.
या प्रसंगी केआरसीएलचे संचालक, रेल्वे वाहतूक व्यवस्थापक (रत्नागिरी व कारवार विभाग), उपमहाव्यवस्थापक तसेच सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन (CWC) चे प्रतिनिधी उपस्थित होते. उद्योग क्षेत्रातील भागधारकांनीही मालवाहतुकीतील आव्हाने, संधी आणि अपेक्षांबाबत आपली मते मांडली.
कोकण रेल्वेच्या माध्यमातून मालवाहतुकीला अधिक गती देणे, ग्राहकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय वाढविणे हा या व्यापार मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे केआरसीएलकडून सांगण्यात आले.
या उपक्रमामुळे कोकण रेल्वे आणि उद्योग क्षेत्रातील संबंध अधिक दृढ होण्यास तसेच मालवाहतूक व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.