मुंबई— बाजारात विक्री होणाऱ्या अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत नागरिकांना कोणतीही शंका अथवा तक्रार असल्यास ती थेट अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाकडे विनाशुल्क नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याची शंका, भेसळ, कालबाह्य उत्पादने, चुकीचे लेबलिंग अथवा अन्य कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास नागरिकांनी विभागाशी संपर्क साधावा. तक्रारदारांना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा ई-मेलद्वारे तक्रार नोंदविता येणार आहे. प्राप्त तक्रारींची संबंधित विभागाकडून पडताळणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी अशा तक्रारी तत्काळ नोंदवाव्यात, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.