मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय मूल्यमापन कालावधीस मुदतवाढ
मुंबई, दि. ५ जून : राज्यातील ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय मूल्यमापन कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि अधिकाधिक ग्रामपंचायतींना सहभागी होण्याची संधी मिळावी या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली असून, जिल्हास्तरावरील मूल्यांकन प्रक्रिया आता वाढीव कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.
या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतींच्या स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धन, डिजिटल सेवा, महसूल वाढ, लोकसहभाग, शाश्वत विकास आणि उत्तम प्रशासन यांसारख्या विविध निकषांवर मूल्यमापन केले जाते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्यस्तरावर गौरविण्यात येते.
मुदतवाढीमुळे ग्रामपंचायतींना आवश्यक माहिती, कागदपत्रे आणि कामगिरीचे तपशील सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध होणार असून, अभियानात अधिक प्रभावी सहभाग नोंदविता येणार आहे.
राज्यातील सर्व पात्र ग्रामपंचायतींनी या संधीचा लाभ घेऊन अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन ग्रामविकास विभागाकडून करण्यात आले आहे.


