सिंधुदुर्ग, प्रतिनिधी : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत असून जिल्ह्याची विकासाकडे घोडदौड सुरू असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. विशेषतः गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १६६ शेतकरी कुटुंबांना तब्बल ३ कोटी ३० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले आहे.
शेती करताना अपघाताची जोखीम कायम असते. अशा कठीण प्रसंगी शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहत असून या योजनेमुळे अपघातग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. अपघातामुळे निर्माण होणारे आर्थिक संकट कमी करण्यासाठी शासनाकडून थेट आणि पारदर्शक पद्धतीने मदत दिली जात आहे.
या आर्थिक सहाय्यामुळे अनेक कुटुंबांना मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि भविष्यातील नियोजनासाठी नवी आशा मिळाली असून शेतकरी कल्याणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले.