ग्रामीण अर्थकारणाला चालना देणाऱ्या गावठी आठवडा बाजाराचे नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
ग्रामीण अर्थकारणाला चालना देणाऱ्या गावठी आठवडा बाजाराचे नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
कणकवली (प्रतिनिधी) :
ग्रामीण भागातील उत्पादक, महिला बचत गट आणि लघुउद्योजकांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देत ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्याच्या उद्देशाने कणकवली पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गावठी आठवडा बाजाराचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, महिला बचत गटांच्या सदस्य, शेतकरी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उद्घाटनानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी विविध स्टॉल्सना भेट देत ग्रामीण भागातील महिला आणि स्थानिक उत्पादकांनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी केली.
गावागावांतून आणलेले घरगुती खाद्यपदार्थ, मसाले, लोणची, पापड, सेंद्रिय उत्पादने, काजू प्रक्रिया उत्पादने, हस्तकला साहित्य तसेच पारंपरिक ग्रामीण उत्पादनांचे त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी ग्रामीण भागातील महिला आणि शेतकरी हे स्थानिक अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात तयार होणाऱ्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध झाल्यास स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळून गावांचा आर्थिक विकास अधिक वेगाने होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. महिला बचत गट, स्वयंरोजगार उपक्रम आणि ग्रामीण उद्योगांना शासनाच्या विविध योजनांद्वारे अधिक बळ देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कणकवली तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या महिला उद्योजिकांनी या बाजारात उत्साहाने सहभाग घेतला. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या उत्पादनांची थेट ग्राहकांना विक्री करण्याची संधी मिळाल्याने महिलांमध्ये समाधानाचे वातावरण होते. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने अनेक स्टॉल्सवर खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळाली. गावठी आठवडा बाजार हा केवळ विक्रीचा उपक्रम नसून ग्रामीण उत्पादकांना प्रोत्साहन देणारे प्रभावी व्यासपीठ असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याबरोबरच ग्रामीण भागातील कौशल्य, गुणवत्ता आणि उद्योजकतेला नवे दालन उघडून देण्याचे कार्य या उपक्रमातून होत असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
कणकवली पंचायत समितीच्या या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण भागातील उत्पादनांना थेट ग्राहक मिळत असून महिला बचत गटांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होत आहे. त्यामुळे गावठी आठवडा बाजार हा ग्रामीण अर्थकारणाला नवी गती देणारा आणि आत्मनिर्भर गावांच्या संकल्पनेला बळकटी देणारा उपक्रम ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिक आणि सहभागी उत्पादकांकडून व्यक्त करण्यात आली