सिंधुदुर्गातील ३,६७४ शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध; पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण करावे
एमपीएससी राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२७ पासून नव्या स्वरूपात
वैकल्पिक विषय रद्द, मुलाखतीला १७५ गुण
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२७ पासून परीक्षा पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या पद्धतीनुसार मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयाचे दोन्ही पेपर रद्द करण्यात आले असून, मुलाखतीसाठी १७५ गुण निश्चित करण्यात आले आहेत.
आयोगाने २५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२७ पासून एकूण सात अनिवार्य पेपर असतील. त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी या भाषा विषयांचे प्रत्येकी एक अर्हताकारी पेपर, निबंधाचा एक पेपर आणि सामान्य अध्ययनाचे चार पेपर यांचा समावेश असेल.
मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा विषयांच्या पेपरमध्ये किमान २५ टक्के गुण मिळविणे आवश्यक असेल. हे दोन्ही पेपर केवळ अर्हताकारी (Qualifying) स्वरूपाचे असून, अंतिम गुणवत्ता यादीसाठी त्यांचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत.
अंतिम निकालासाठी निबंधाचा एक पेपर आणि सामान्य अध्ययनाचे चार पेपर, अशा एकूण पाच पेपर्सचे १,२५० गुण विचारात घेतले जाणार आहेत. वैकल्पिक विषय वगळल्यामुळे लेखी परीक्षेचे एकूण गुणही १,२५० निश्चित करण्यात आले आहेत.
तसेच, लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांचे गुणोत्तर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संतुलित ठेवण्यासाठी मुलाखतीचे गुण १७५ निश्चित करण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
या निर्णयानुसार राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२७ ची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहितीही आयोगाने दिली आहे.