भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकण विभागासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २ व ३ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच मच्छीमारांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २ व ३ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, त्यानंतर ४ ते ६ ऑगस्टदरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पुढील पाचही दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कोकण किनारपट्टीवरील नद्या, ओढे आणि सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क असून, नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हानिहाय अंदाज
रायगड: २ व ३ ऑगस्ट – काही ठिकाणी मुसळधार पाऊस, पुढील तीन दिवस मध्यम पाऊस.
सिंधुदुर्ग: २ व ३ ऑगस्ट – काही ठिकाणी मुसळधार पाऊस, पुढील तीन दिवस मध्यम पाऊस.