टाटा मोटर्सच्या संपूर्ण बॅटरी इलेक्ट्रिक ट्रक श्रेणीचे अनावरण; हरित वाहतूक क्रांतीकडे महाराष्ट्राची वाटचाल
टाटा मोटर्सच्या संपूर्ण बॅटरी इलेक्ट्रिक ट्रक श्रेणीचे अनावरण
हरित वाहतूक क्रांतीकडे महाराष्ट्राची वाटचाल
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते टाटा मोटर्सच्या ७ ते ५५ टन क्षमतेच्या भारतातील पहिल्या संपूर्ण बॅटरी इलेक्ट्रिक ट्रक श्रेणीचे अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक उपक्रमामुळे देशातील हरित आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, आजचा दिवस केवळ नवीन इलेक्ट्रिक ट्रकच्या लॉन्चचा नसून भारताच्या हरित वाहतूक क्रांतीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. बॅटरी आणि इलेक्ट्रिक ट्रकसाठी स्वतंत्र धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून, राज्य पुन्हा एकदा देशाला पर्यावरणपूरक वाहतुकीची दिशा दाखवत आहे.
महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी अनुकूल धोरणात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. राज्याच्या ईव्ही (EV) धोरणामुळे वाहन उत्पादक, उद्योग क्षेत्र आणि वाहतूक व्यवसायाला नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यात भारतीय अभियंत्यांनी डिझाइन आणि विकसित केलेले हे इलेक्ट्रिक ट्रक ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे नमूद करताना, भारतीय कौशल्य, तंत्रज्ञान आणि उत्पादनक्षमतेची ताकद या वाहनांमधून स्पष्टपणे दिसून येते, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.