CSMT-सावंतवाडी रोडदरम्यान नियमित एक्सप्रेस रेल्वेसेवा सुरू; कोकणवासीयांची दीर्घकाळची मागणी पूर्ण
CSMT-सावंतवाडी रोडदरम्यान नियमित एक्सप्रेस रेल्वेसेवा सुरू; कोकणवासीयांची दीर्घकाळची मागणी पूर्ण
मुंबई–कोकण प्रवास अधिक सुलभ, वेगवान आणि सोयीस्कर होणार : पालकमंत्री नितेश राणे
मुंबई : कोकणवासीयांची दीर्घकाळची मागणी पूर्ण करत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोडदरम्यान नियमित एक्सप्रेस रेल्वेसेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. या नियमित रेल्वेसेवेचा शुभारंभ आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून करण्यात आला.
या शुभारंभ कार्यक्रमाला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्ष उपस्थित होते.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या नव्या नियमित रेल्वेसेवेमुळे मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणातील प्रवाशांसाठी ही रेल्वेसेवा महत्त्वपूर्ण ठरणार असून, मुंबई–कोकण प्रवास अधिक सुलभ, वेगवान आणि सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे.
“कोकणवासीयांची दीर्घकाळची मागणी पूर्ण करत ही नवी रेल्वेसेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे,” अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या रेल्वेसेवेचा कोकणातील प्रवाशांना मोठा फायदा होणार असल्याचेही नितेश राणे यांनी नमूद केले.
मुंबईत रोजगार, व्यवसाय, शिक्षण तसेच विविध कामांसाठी ये-जा करणाऱ्या कोकणातील नागरिकांसाठी ही नियमित एक्सप्रेस सेवा महत्त्वाची ठरणार असून, कोकणच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्येही या सेवेमुळे भर पडली आहे.