
आयएलएस महाविद्यालयातील बेकायदेशीर शुल्क परत करण्याचे आदेश
विद्यार्थ्यांच्या बाजूने सरकारचा निर्णय
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे विद्यार्थ्यांची बाजू न्याय्य ठरवत पुण्यातील आयएलएस विधि महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून वसूल केलेले अतिरिक्त शुल्क सहा टक्के व्याजासह परत करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत.
विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत शासनाने ही भूमिका घेतली असून संबंधित महाविद्यालयाकडून करण्यात आलेल्या बेकायदेशीर शुल्क वसुलीप्रकरणी कठोर पावले उचलण्यात येत आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, राज्यातील इतर महाविद्यालयांमध्येही अतिरिक्त शुल्क आकारणी होत असल्यास त्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांना देण्यात आले आहेत. महाविद्यालयांमधील शुल्क निर्धारण प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करणे यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

