ठाण्यातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी युद्धपातळीवर काम करा – एकनाथ शिंदे
ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यातील शासकीय व गायरान जमिनींवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
या निर्णयामुळे गोरगरिबांना न्याय मिळणार असून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या घरांच्या प्रश्नाला कायमस्वरूपी तोडगा निघणार असल्याचे त्यांनी नमूद केले. २५ मार्च २०२६ रोजी राज्य शासनाने घेतलेला हा महत्त्वाकांक्षी निर्णय असून, सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांमुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे रखडलेले प्रकरण आता मार्गी लागणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्ह्यातील आमदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधत, या योजनेचा लाभ शेवटच्या पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.


