आर्थिक संकटावर मात करत भूषण कडूंचे रंगभूमीवर पुनरागमन
मुंबई l प्रतिनिधी
मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय विनोदी अभिनेता भूषण कडू यांनी अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे. पत्नीच्या निधनानंतर आलेल्या वैयक्तिक दुःखासह आर्थिक अडचणींचा सामना करत त्यांनी पुन्हा नव्याने उभे राहत एक नवीन नाटक लिहिले आहे.
करोनाकाळात पत्नीच्या निधनामुळे भूषण कडू यांच्यावर मोठा मानसिक आघात झाला होता. या काळात त्यांना आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागले. परिस्थिती इतकी कठीण झाली की आपल्या मुलाच्या काही इच्छा पूर्ण करता आल्या नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या सर्व परिस्थितीमुळे काही काळ ते नैराश्यात गेले होते आणि आत्महत्येचाही विचार मनात आला होता, असे त्यांनी सांगितले.
मात्र कठीण प्रसंगांवर मात करत त्यांनी स्वतःला सावरले आणि पुन्हा कामाकडे वळण्याचा निर्धार केला. अलीकडेच राजश्री मराठी शोबझ या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या नव्या नाटकाबाबत माहिती दिली. हे नाटक त्यांनी स्वतः लिहिले असून त्यामध्ये विनोद, रहस्य आणि भयाचा संगम असणार आहे.
या नाटकातून समाजातील “कसं असावं आणि कसं नसावं” यासारख्या मुद्द्यांवर हलक्याफुलक्या पण विचार करायला लावणाऱ्या पद्धतीने भाष्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वर्षांनंतर भूषण कडू यांचे रंगभूमीवरील पुनरागमन होत असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.


