आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली भाविकांची विश्वासू सोबती; एसटीला ४१ कोटींहून अधिक उत्पन्न
मुंबई : आषाढी एकादशी यात्रेदरम्यान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) **‘लालपरी’**ने लाखो वारकऱ्यांना आणि भाविकांना सुरक्षित व वेळेवर सेवा देत पुन्हा एकदा विश्वासू प्रवाससाथी असल्याचे सिद्ध केले आहे.
यंदाच्या आषाढी यात्रा कालावधीत एसटी महामंडळाने राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष नियोजन केले होते. यात्रेदरम्यान ५,५०० एसटी बसांच्या माध्यमातून तब्बल २१,५२७ फेऱ्या करण्यात आल्या. या विशेष सेवांचा लाभ ९ लाख २४ हजार ५३८ भाविक प्रवाशांनी घेतला.
या वाहतूक व्यवस्थेमुळे एसटी महामंडळाला ४१ कोटी १८ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, हे उत्पन्न गतवर्षीच्या तुलनेत ५ कोटी ३० लाख रुपयांनी अधिक असल्याची नोंद झाली आहे.
आषाढी यात्रेसाठी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. वारकऱ्यांची वाढती संख्या, सुयोग्य नियोजन आणि एसटी कर्मचाऱ्यांचे समर्पित योगदान यामुळे यंदाची यात्रा वाहतूक व्यवस्था यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे.
पंढरपूरच्या आषाढी यात्रेत लाखो भाविकांच्या सेवेसाठी सज्ज राहणाऱ्या एसटीच्या ‘लालपरी’ने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेतील आपले महत्त्व अधोरेखित केले आहे.