ओसरगाव टोल नाक्यावरून वाद; स्थानिकांना टोलमुक्तीची विनायक राऊत यांची मागणी
🔥 दैनिक सिंधुदुर्ग समाचार
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओसरगाव येथे टोल नाका पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींवरून वाद निर्माण झाला असून माजी खासदार विनायक राऊत यांनी स्थानिकांना टोलमुक्ती देण्याची ठाम मागणी केली आहे.
ओसरगाव हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने जिल्हा मुख्यालयाकडे ये-जा करणाऱ्या शेकडो वाहनांना दररोज टोल भरावा लागेल, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यापूर्वीही टोल नाका सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तो आंदोलनाच्या माध्यमातून रोखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
“टोल नाका सुरू करायचा असेल तर करा, मात्र सिंधुदुर्गातील रहिवाशांना पूर्णपणे टोलमुक्ती मिळालीच पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका राऊत यांनी मांडली. अन्यथा जबरदस्तीने टोल नाका सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि टोल सुरू होऊ दिला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी संबंधित विभागाला दिला आहे.


