कल्याण–मुरबाड मार्गावरील एसटी फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; ५ हजारांहून अधिक प्रवाशांना दररोज लाभ
कल्याण–मुरबाड मार्गावरील एसटी फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; ५ हजारांहून अधिक प्रवाशांना दररोज लाभ
कल्याण, प्रतिनिधी : कल्याण–मुरबाड या महत्त्वाच्या एसटी मार्गावरील प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने बस फेऱ्यांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. या मार्गावर आता ‘राजमाता जिजाऊ’ बसेसही सुरू करण्यात आल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी झाला आहे.
५ मे २०२६ पूर्वी या मार्गावर दररोज केवळ ४८ फेऱ्या उपलब्ध होत्या. त्यामुळे सुमारे २,५०० प्रवासी या सेवेचा लाभ घेत होते. मात्र वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने फेऱ्यांची संख्या ४८ वरून थेट १०८ पर्यंत वाढवली आहे.
फेऱ्यांमध्ये झालेल्या या वाढीमुळे आता दररोज ५,००० हून अधिक प्रवासी या सेवेचा लाभ घेत असून, नागरिकांचा वेळ आणि पैशांची बचत होत आहे. तसेच खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन सुरक्षित आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक उपलब्ध झाली आहे.
‘राजमाता जिजाऊ’ बसेसच्या समावेशामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव मिळत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे कल्याण–मुरबाड परिसरातील विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांना मोठा फायदा झाला आहे.