कसबा विश्रामबाग मतमोजणीत अनियमिततेचा आरोप- रुपाली ठोंबरे यांचा न्यायासाठी संघर्ष
पुणे : कसबा विश्रामबाग क्षेत्रीय निवडणूक कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक २५, शनिवार पेठ महात्मा फुले मंडई येथे १६ तारखेला झालेल्या मतमोजणीदरम्यान गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप उमेदवार रुपाली ठोंबरे यांनी केला आहे. पहिल्याच फेरीत मतमोजणी मशीन बदलण्यात आल्यावर आक्षेप नोंदवण्याचा प्रयत्न केला असता तो स्वीकारला गेला नाही, तरीही मतमोजणी सुरू ठेवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कायदेशीर नियमानुसार मतमोजणीदरम्यान उमेदवार जाळीच्या आत उपस्थित राहून निवडणूक निर्णय अधिकारी (RO) यांच्यासोबत असणे, तसेच RO टेबलावर बसून उमेदवार त्यांच्या समोर खाली उभा असणे आवश्यक असते. मात्र हा नियम कसबा विश्रामबागचे RO यांनी पाळला नाही, असा गंभीर आरोप ठोंबरेयांनी केला आहे. न्याय न मिळाल्याने आणि प्रक्रिया थांबवली जात नसल्यामुळे आपल्याला थेट जाळीवर चढून आंदोलन करावे लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रविवारी कार्यालय बंद असताना RO यांनी आपल्याला पत्र देऊन गेल्याचा दावाही त्यांनी केला असून, ते उत्तर अपूर्ण असल्याचे ठोंबरे यांनी नमूद केले आहे. आता ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कायदेशीर व पारदर्शकतेच्या मुद्द्यावर हायकोर्टात आव्हान देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“संविधान आणि कायद्यापुढे कोणीही मोठे नाही. ना निवडणूक अधिकारी, ना पोलीस, ना सरकारी यंत्रणा,” असा ठाम विश्वास व्यक्त करत जाळीवर चढण्याला स्टंट म्हणणाऱ्यांना त्यांनी प्रत्युत्तर दिले. ही कृती न्यायहक्कासाठीची लढाई होती, असे सांगून सोशल मीडियावर होणाऱ्या अपप्रचार, बदनामी व अश्लील टीकेबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या ट्रोलिंगमुळे कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


