कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम सुरू
कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम सुरू असून, रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ३५ समुद्रकिनाऱ्यांवर कासव संवर्धनाची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७९ कासवांची घरटी आढळून आली असून त्यातील १८ हजार ७३६ अंड्यांचे यशस्वीरीत्या संरक्षण करण्यात आले आहे. या अंड्यांतून बाहेर पडलेली ६६ पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आली असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.
यंदाच्या हंगामातील एक विशेष बाब म्हणजे गुहागर येथील समुद्रकिनाऱ्यावर पूर्वी टॅगिंग करण्यात आलेली चार कासवे पुन्हा अंडी घालण्यासाठी परतली आहेत. यामुळे कासवे जन्मस्थळालाच पुन्हा येऊन अंडी घालतात, हा वैज्ञानिक निष्कर्ष पुन्हा अधोरेखित झाला असून, कासव संवर्धन मोहिमेसाठी हे मोठे यश मानले जात आहे.
वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक ‘कासव मित्र’ संस्थांचे स्वयंसेवक रात्रंदिवस गस्त घालत असून, कासवांची घरटी कुत्रे, कोल्हे तसेच इतर भक्षकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत.


