खाजगी प्रवासी बसमधून अवैध मालवाहतूक केल्यास थेट परवाना रद्द - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
खाजगी प्रवासी बसमधून अवैध मालवाहतूक केल्यास थेट परवाना रद्द – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई –
राज्यातील खाजगी प्रवासी बसमधून कुरिअर पार्सल किंवा अवैध मालवाहतूक करणाऱ्या चालक आणि बसमालकांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार असून वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित बसचा परवाना थेट रद्द करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत दिला.
प्रवासी वाहतुकीसाठी असलेल्या बसमधून बेकायदेशीररीत्या मालवाहतूक होत असल्याच्या तक्रारींवर सरकार गंभीर असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मोटार वाहन कायद्यातील कलम ८६ अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नियम मोडल्यास कारवाईचे स्वरूप :
🔹 पहिली वेळ – ७ ते १० दिवस परवाना निलंबन
🔹 दुसरी वेळ – १० ते १५ दिवस परवाना निलंबन
🔹 तिसरी वेळ – १५ ते ३० दिवस परवाना निलंबन
🔹 चौथी वेळ – परवाना कायमस्वरूपी रद्द
परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत ५,७२८ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ₹४६१.७८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच १ एप्रिल ते ३१ मे २०२६ या कालावधीत १,४५४ वाहनांवर कारवाई करून ₹७८.१८ लाख दंड वसूल करण्यात आला आहे.
याशिवाय, शहरांमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकृत बस थांबे विकसित करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली.
राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, एसटी महामंडळाच्या ताफ्यात ८,३०० नवीन बसेस दाखल झाल्या असून राज्यात एसटी सेवेसाठी कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक चांगली सेवा देणे शक्य होणार आहे.