गावातील रानभाज्या आरोग्याबरोबरच गावाचे अस्तित्वही जपतात - सौ. अर्चना बंगे
गावातील रानभाज्या आरोग्याबरोबरच गावाचे अस्तित्वही जपतात – सौ. अर्चना बंगे
कुडाळ (प्रतिनिधी) :
गावातील रानभाज्या केवळ आरोग्य जपत नाहीत तर गावातील आपले अस्तित्वही जपतात, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे यांनी केले.
नेरुर येथे आयोजित रानभाज्या महोत्सव च्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना सौ. बंगे म्हणाल्या, “रानभाज्या ही संकल्पना नेरुर येथील रानमाणूस श्री. राजा शृंगारे यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज संपूर्ण कुडाळ तालुक्यात रानभाज्यांचे प्रदर्शन आणि बाजार भरवले जात आहेत. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.”
रानभाज्यांमुळे स्थानिक शेतकऱ्यांना आणि महिलांना रोजगार मिळतो. तसेच पारंपरिक ज्ञान जपले जाते. त्यामुळे अशा महोत्सवांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असेही त्या पुढे म्हणाल्या.
उद्घाटन सोहळा
या रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. दीप्ती नाईक, माजी पंचायत समिती सदस्या सौ. दीपश्री नेरकर यांच्यासह गावातील विविध मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. त्यांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.