केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत मालवण शहरातील ज्या लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्डासाठी नोंदणी केली होती, त्या सर्व लाभार्थ्यांची छापील आयुष्मान कार्ड मालवण ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध झाली आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधून आपली कार्ड ताब्यात घ्यावीत, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी केले आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू नागरिकांसाठी लाभदायक असून, पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार या योजनेअंतर्गत उपलब्ध होतात. शहरातील अनेक नागरिकांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. लाभार्थ्यांनी विलंब न करता मालवण रुग्णालयातून कार्ड स्वीकारावे, जेणेकरून गरज भासल्यास या योजनेचा लाभ तातडीने घेता येईल,असेही डॉ.पाटील यांनी आवाहन केले आहे.