जाचक अटी हटवल्याशिवाय आंदोलन मागे नाही; रोहित पवार यांचा इशारा
जाचक अटी हटवल्याशिवाय आंदोलन मागे नाही; रोहित पवार यांचा इशारा
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयातील (GR) दोन जाचक अटींमुळे सुमारे ३७ लाखांहून अधिक शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
कर्जमाफीच्या जीआरमध्ये २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी २०२५-२६ आणि २०२६-२७ या दोन्ही वर्षांचे पीक कर्ज नियमितपणे फेडणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या दोन अटींमुळे लाखो शेतकरी योजनेच्या लाभापासून दूर राहणार असल्याने त्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
“या दोनच जाचक अटी आधी हटवा, एवढीच आमची साधी आणि सरळ मागणी आहे. तोपर्यंत अन्नत्याग आंदोलनातून माघार घेणार नाही,” असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.