
ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या निधनाने राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई │
महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात शालीनता, सुसंस्कृतता आणि संतुलित नेतृत्वाचा लौकिक निर्माण करणारे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या निधनाने राज्यातील राजकारण व समाजकारण क्षेत्रावर मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, “महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला एका उंचीवर नेऊन ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याचे काम शिवराज पाटील-चाकूरकर यांनी केले. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य सदैव स्मरणात राहील.”
ते पुढे म्हणाले की, “माजी लोकसभा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी देशातील संसदीय परंपरा अधिक बळकट केल्या. त्यांच्या निधनामुळे राजकारण-समाजकारणातील उत्तुंग, दिशादर्शक नेतृत्वाला आपण मुकलो आहोत.”
राजकीय क्षेत्रात संयम, शिस्त आणि शालीनतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या निधनाने राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

