पाणीपातळी २४.२० मीटरवर; नदीकाठ व सखल भागातील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
रोहा, दि. ७ जुलै :
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील डोलवहाल बंधाऱ्याची पाणीपातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वाढली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार, डोलवहाल बंधाऱ्याची पाणीपातळी २४.२० मीटरवर पोहोचली असून ती धोका पातळी २३.९५ मीटरपेक्षा अधिक आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या खालच्या भागात तसेच नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात किंवा सखल भागात जाणे टाळावे, तसेच कोणतीही अफवा न पसरवता प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, संबंधित यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता आवश्यक ती खबरदारी आणि आपत्कालीन उपाययोजना करण्यात येत आहेत.