दि. बा. पाटील यांच्या नावासाठी आज मंत्रालयावर ऐतिहासिक महामोर्चा
भूमिपुत्रांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी मुंबईतील मंत्रालयावर ऐतिहासिक महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध भूमिपुत्र संघटना, सामाजिक संस्था आणि दि. बा. पाटील समर्थकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या आवाहन पत्रकात, “चला मंत्रालय… स्वाभिमानासाठी!” अशी घोषणा देण्यात आली असून, दि. बा. पाटील यांच्या नावाला आणि त्यांच्या कार्याला न्याय मिळावा, यासाठी ही लढाई असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे आंदोलन भूमिपुत्रांच्या अस्मितेचे, सन्मानाचे आणि हक्कांचे प्रतीक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावातून जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेणे, प्रत्येक घरापर्यंत आंदोलनाची माहिती पोहोचवणे तसेच व्हॉट्सअॅप ग्रुप, युवक मंडळे, महिला मंडळे, क्रीडा संघटना आणि विविध सामाजिक संस्थांनी या मोर्चाचा प्रचार करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आयोजकांनी नागरिकांना गावागावांतून मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन केले आहे.


