दुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत
दोडामार्ग | प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे, आयी, घोटगेवाडी, उसप आणि मांगेली येथील माध्यमिक शाळा कमी पटसंख्येच्या कारणावरून बंद करण्याचा शासन निर्णय (जीआर) जाहीर झाल्याने तालुक्यात शिक्षण व्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांचे इतरत्र समायोजन करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी दोडामार्ग यांना दिल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबू नाईक यांनी दिली.
हे पण वाचा १२ रोजी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येणार
या निर्णयामुळे दुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत येणार असून त्यांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शाळा बंद करण्याऐवजी ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम कराव्यात, अशी मागणी बाबू नाईक यांनी केली आहे.
दरम्यान, या निर्णयासंदर्भात दोडामार्ग तालुका काँग्रेसचे शिष्टमंडळ गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पोहोचले असता ते कुडाळ येथे गेल्याचे समजले. कार्यालयातील अधिकारी श्री. शेट्ये यांनी संबंधित आदेश अद्याप प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. ही भूमिका समाधानकारक नसल्याने तालुकाध्यक्ष बाबू गवस यांनी थेट गटशिक्षणाधिकारी नदाफ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी बाळा धाऊसकर व रॉकी फर्नांडिस उपस्थित होते.


