बाहुबली अखेर तिलारीत परतला
वीजघर–बांबर्डे परिसरात पिता–पुत्र भेटीची शक्यता
वीजघर–बांबर्डे परिसरात पिता–पुत्र भेटीची शक्यता
पणजी :
गेले अनेक महिने सावंतवाडी तालुक्यातील आंबोली नांगरतास परिसर तसेच चंदगड तालुक्यात मुक्कामाला असलेला ‘बाहुबली’ हा प्रचंड टस्कर पुन्हा एकदा तिलारी खोऱ्यात दाखल झाला आहे. बाहुबली हा निमवयस्क टस्कर ‘ओंकार’चा पिता असून, ओंकार तिळारीत आल्यानंतर बाहुबली चंदगडमधून त्याच्या दिशेने निघाल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.
शुक्रवारी पहाटे सुमारे ४.३५ वाजण्याच्या सुमारास बाहुबलीने वीजघर परिसरातील नदीपात्र ओलांडून जंगल भागात प्रवेश केला. तो ओंकारच्या दिशेने जात असून, लवकरच पिता–पुत्राची भेट होण्याची दाट शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे.
यापूर्वी १९ डिसेंबर रोजी ओंकार आणि त्याची आई यांची तेरवण मेढे येथील धरण परिसरात रात्री भेट झाली होती. त्यानंतर पाच हत्तींचा कळप आणि ओंकार वेगवेगळ्या दिशेने गेले असले तरी ते एकमेकांच्या आसपासच वावरत होते.
यापूर्वी १९ डिसेंबर रोजी ओंकार आणि त्याची आई यांची तेरवण मेढे येथील धरण परिसरात रात्री भेट झाली होती. त्यानंतर पाच हत्तींचा कळप आणि ओंकार वेगवेगळ्या दिशेने गेले असले तरी ते एकमेकांच्या आसपासच वावरत होते.
दरम्यान, ओंकार गुरुवारी रात्री ८.२१ वाजता तेजस गावडे यांच्या शेताकडून बांबर्डे येथील जंगल भागात गेला. त्यानंतर तो घाटीवडे येथील मंगळ मोडी परिसरात असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे. याच भागात बाहुबली पोहोचण्याची शक्यता असल्याने पिता–पुत्राची भेट होण्याची शक्यता बळावली आहे.
दुसरीकडे, ओंकारची आई, टस्कर गणेश, एक छोटी मादी आणि दोन पिल्ले असा पाच हत्तींचा कळप शुक्रवारी सकाळी ८.४६ वाजता केर बांदिवळ येथील जंगल भागात आढळून आला. हा कळप गेल्या अनेक दिवसांपासून वीजघर–बांबर्डे परिसरात वास्तव्यास होता. त्यानंतर तो मोर्ले, केर आणि पाळ्ये परिसरात पोहोचला आहे. त्यामुळे या भागात शेती व मालमत्तेच्या नुकसानीची तीव्रता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बऱ्याच कालावधीनंतर तिलारी खोऱ्यात पुन्हा एकदा सात हत्तींचा कळप दाखल झाला आहे. या कळपात दोन मोठे टस्कर (गणेश व बाहुबली), एक निमवयस्क टस्कर (ओंकार), एक मोठी मादी, एक छोटी मादी आणि दोन पिल्ल्यांचा समावेश आहे.
वन विभागाकडून या संपूर्ण हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, स्थानिक नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वन विभागाकडून या संपूर्ण हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, स्थानिक नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


