बुरोंडी मच्छीमार जेट्टी संदर्भात मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी हे मासळी उतरवण्याच्या प्रमुख केंद्रांपैकी एक असून येथील मच्छीमारांच्या विविध समस्या शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत.
बैठकीत मच्छीमारांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच मत्स्य व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. Fisheries and Aquaculture Infrastructure Development Fund (FIDF) या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत हर्णे मत्स्य बंदर विकासाचे काम सुरू असून त्याच धर्तीवर बुरोंडी येथेही आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या प्रस्तावित जेट्टी प्रकल्पामुळे मासळी वाहतुकीचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच मासळीचा दर्जा टिकून राहून स्थानिक मच्छीमारांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मोठा हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. दापोली तालुक्यातील मत्स्य व्यवसायाला चालना मिळून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असेही यावेळी सांगण्यात आले.
बैठकीला माजी आमदार सूर्यकांत दळवी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, केदार साठे, शिवानी गावकर, स्थानिक मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.