मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेचा विश्वविक्रम, गिनीज बुकमध्ये नोंद
रत्नागिरी | प्रतिनिधी
महाराष्ट्राने ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ या योजनेत ऐतिहासिक कामगिरी करत एका महिन्यात तब्बल ४५ हजार ९११ सौर कृषीपंप बसविण्याचा विश्वविक्रम केला आहे. या विक्रमाची अधिकृत नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली असून, याबाबतचा प्रमाणपत्र सोहळा शेंद्रा एमआयडीसी – तील ऑरिक सिटी मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारण्यात आला.
सहकारी बँकांना झाले आहे तरी काय? पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न!
हे पण वाचा सहकारी बँकांना झाले आहे तरी काय? पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न!
या वेळी गिनीज बुकचे प्रतिनिधी कार्ल सॅविले यांनी विक्रमाची औपचारिक घोषणा केली. विक्रमासाठी आवश्यक असलेले ३५ हजार पंप ओलांडून राज्याने तब्बल ४५ हजारांहून अधिक पंप बसविल्याने हा जागतिक विक्रम ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी १६ हजार मेगावॅट स्वतंत्र वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे प्रदूषणमुक्त वीज उपलब्ध होईल आणि इतर वापरासाठीची वीज स्वस्त दरात मिळू शकेल. त्यामुळे भविष्यात दरवर्षी ३ टक्के दरकपात करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यात आजपर्यंत ७ लाखांहून अधिक सौर कृषीपंप बसविण्यात आले असून, पुढील वर्षभरात ही संख्या १० लाखांवर नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मराठवाड्याचा यामध्ये मोठा वाटा असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच १४ हजार पंप बसविण्यात आले आहेत.
या योजनेमुळे ऊर्जाक्षेत्रास चालना मिळाली असून सौर उपकरण निर्मिती, देखभाल व सेवा क्षेत्रात सुमारे एक लाख रोजगार निर्माण झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्र देशात सौर ऊर्जेच्या वापरात आघाडीवर असल्याचे यामुळे पुन्हा सिद्ध झाले आहे.


