मुंबईत ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेचा शुभारंभ
मुंबई : वांद्रे, खार आणि सांताक्रुझ पश्चिम परिसरातील (एच पश्चिम वॉर्ड) सुमारे ५५ हजार घरांतील युवकांच्या कौशल्य क्षमता व कल जाणून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेचा शुभारंभ सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही योजना मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना मंत्री शेलार म्हणाले की, भारत हा युवकांचा देश असून येथील तरुण पिढीमध्ये जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याची क्षमता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘विकसित भारत २०४७’ हे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला ‘विकसित महाराष्ट्र’चा रोडमॅप साकार करण्यासाठी कौशल्य विकास हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ ही देशातील अशा प्रकारची पहिलीच योजना असून युवकांच्या क्षमतांचा अभ्यास करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. मुंबई उपनगर जिल्ह्याने घेतलेला हा पुढाकार राज्यासाठीही दिशादर्शक ठरेल, असा विश्वास मंत्री शेलार यांनी व्यक्त केला.


