‘मुंबई रेल्वे प्रवाशांचे अवेंजर्स’
ज्येष्ठ प्रवासी कार्यकर्त्यांचा अराजकीय संवाद, उपनगरीय रेल्वेतील बदलांचा आढावा
मुंबई | प्रतिनिधी
मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितता, सुविधा आणि पायाभूत सुधारणांवर केंद्रित एक अनौपचारिक व अराजकीय संवाद सत्र दादर (पश्चिम) येथे पार पडले. दीर्घकाळ प्रवासी हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या या संवादाला प्रतीकात्मक स्वरूपात “मुंबई रेल्वे प्रवाशांचे अवेंजर्स” असे संबोधण्यात आले.
या बैठकीत प्रवासी संघटनांचे नेते, वाहतूक तज्ज्ञ, नागरिक प्रतिनिधी आणि अभ्यासक सहभागी झाले होते. गेल्या २० ते ३० वर्षांत मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी झालेल्या संघर्ष, सुधारणा आणि बदलांवर अनुभव मांडण्यात आला.
मुंबई रेल प्रवासी संघाचे अध्यक्ष मधु कोटियन यांनी सांगितले की, पूर्वी अपघात आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर निधीअभावी विकास रखडत असे. मात्र, प्रवासी संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे MUTP प्रकल्पांना गती मिळाली. कुर्ला–ठाणे अतिरिक्त मार्ग, तसेच CSMT–कुर्ला चौपदरीकरणामुळे सुरक्षितता व क्षमतेत वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.
कैलास वर्मा यांनी केंद्र व राज्य सरकारमधील समन्वयामुळे मुंबईत मेट्रो व रेल्वे पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले. अंधेरी–विरार अतिरिक्त मार्ग आणि स्थानकांच्या आधुनिकीकरणामुळे पश्चिम रेल्वेवरील ताण कमी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना वंदना सोनावणे यांनी महिला डब्यांतील पोलिस तैनाती, CCTV व्यवस्था आणि ‘मेरी सहेली’ उपक्रमामुळे आपत्कालीन प्रतिसाद अधिक जलद झाल्याचे सांगितले.
वाहतूक तज्ज्ञ सिद्धेश देसाई यांनी सोशल मीडियावर आधारित तक्रार निवारण प्रणाली, मेट्रो–रेल्वे एकत्रीकरण आणि आगामी मेट्रो जोडण्यांमुळे प्रवासाचा वेळ कमी झाल्याचे नमूद केले.
संवादाच्या शेवटी ज्येष्ठ प्रवासी नेत्यांनी सुरू असलेले प्रकल्प वेगाने पूर्ण करावेत, उपनगरीय व लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा वेगळ्या कराव्यात आणि शून्य अपघाताचे उद्दिष्ट ठेवून प्रशासनाने प्रवासी संघटनांशी सातत्याने संवाद साधावा, अशी मागणी केली.
या संवादातून मुंबईतील वाहतूक व्यवस्थेतील बदल हे केवळ पायाभूत गुंतवणुकीचे नव्हे, तर प्रवासी चळवळीच्या दशकानुदशकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित असल्याचे स्पष्ट झाले


