मुख्यमंत्री फडणवीस : रत्नागिरीसह चार मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर
मुख्यमंत्री फडणवीस : रत्नागिरीसह चार मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर
रत्नागिरी : महाराष्ट्रातील येरवडा (पुणे), ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर येथील प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा निर्णय केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेने टाकलेले दूरदर्शी आणि मानवकेंद्री पाऊल आहे. या माध्यमातून समाजातील विशेषतः वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचविण्याचा राज्य शासनाचा संकल्प अधिक बळकट होणार आहे.
राज्यातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर येथील चार प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालये सध्या बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवांद्वारे हजारो रुग्णांना सेवा देत आहेत. या रुग्णालयांमध्ये सुमारे ५,७०० खाटांची सुविधा उपलब्ध असून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ कार्यरत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव पुढे आणला आहे. या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात दर्जेदार उपचार सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाला मोठी चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.